अहिल्यानगर – नगर तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये प्रचंड हानी झाली आहे. याची गंभीर दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी तातडीने दौरा करून आपत्तीग्रस्तांना मदत केली. आता पुढील टप्प्यात, येत्या रविवारी ते पुन्हा थेट गावागावांत जाऊन मदतीच्या मोहिमेचा आरंभ करणार आहेत.
खा. लंके यांनी माहिती दिली की, सारोळा कासार, वाळकी, अकोळनेर, जाधववाडी, खडकी, सोनेवाडी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतमाल, जनावरं आणि घरमालमत्तेचाही मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर “आपला मावळा संघटना” व “नीलेश लंके प्रतिष्ठान” यांच्या माध्यमातून गावागावात रस्ते दुरुस्ती आणि आरोग्य सेवा पुरविण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.
ही मदत मोहीम रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्यामध्ये रस्ते दुरुस्ती, वैद्यकीय सेवा आणि पशुवैद्यकीय उपचार अशा सेवा देण्यात येतील. या उपक्रमात जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार लंके यांनी केले आहे.
खा. लंके म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे. मी केवळ सहानुभूती व्यक्त करून थांबणार नाही, तर थेट मदतीसाठी उतरणार आहे. शासनाच्या माध्यमातूनही योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
”या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, डोळ्यांदेखत जनावरं वाहून गेल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. काही भागांतील घरांत चिखल साचलेला असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टींचा स्वतः पाहणी दौऱ्यात अनुभव घेतल्यानंतरच रविवारी मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तरुणांनी पुढे यावेया आपत्कालीन परिस्थितीत “आपला मावळा” आणि “नीलेश लंके प्रतिष्ठान” यांच्या वतीने एक दिवसीय मदत मोहीम राबवली जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील तरुणांनी आत्मीयतेने आणि उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करत खा. लंके यांनी प्रत्यक्ष मदतीच्या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.








