संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावासह विविध भागात वादळ वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अनेक ठिकाणी घरांचे, शेतीपिकांचे तसेच जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळवाऱ्यात धांदरफळ बुद्रुक येथील साठेनगर मधील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील छत उडून गेले. त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. तर डेरेवाडी भागातील संजय शिवाजी साबळे यांच्या संपूर्ण घराचे छत बाजूला झाले आहे. या घटनेमध्ये साबळे यांच्या मुलीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता बाधित भागांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी व घरे पडलेल्या नागरिकांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे आदेश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.









