पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना
अहिल्यानगर : जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ चौकशीच्या सूचना केल्या आहेत.
शल्यचिकित्सकांनी जिल्हा त्रिसदस्यीय समितीला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक तसेच आयुक्तांना पाठविला जाणार आहे.
चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पुढे आली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनावर आरोप झालेयामध्ये रुग्णांना बांधले, प्यायला पाणी दिले नाही, उपचारात हलगर्जीपणा केला, यावरून रुग्णालय प्रशासनाला नातेवाईकांसह सामाजिक संघटनांनीही धारेवर धरल्याचे दिसले.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. शिवशंकर वलांडे व डॉ. दर्शना बारवकर अशी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीला सात दिवसांचा कालावधी दिला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. नेमके मृत्यू का झाले, त्यात कोणाचा दोष आहे का, असेल तर कारवाई झाली पाहिजे, याकरिता या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना सूचना केल्या आहे. तसेच त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना तसे आदेश दिले आहे.








