अहिल्यानगर : विधानसभा निवडणूकीनंतर आता लवकरच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचे बिगूल वाजणार आहे. त्यासाठी राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. राजकीय पक्षांना आता जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अध्यक्षपदाचे उमेदवार शोधावे लागणार आहेत. यामध्ये आता इच्छुकांची गर्दीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वरिष्ठ नेतेमंडळींची डोकेदुखी वाढताना दिसणार आहे. तसेच पक्ष आणि नेते आपल्या मर्जीतील उमेदवाराला बळ देऊन अध्यक्षपदावर बसवणार का? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्या दृष्टीने हे आरक्षण महत्वाचे मानले जाते. आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांना बळ मिळणार आहे. त्यानुसार त्यांना आतापासूनच मोर्चे बांधणी करवी लागणार आहे.
या आरक्षण घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील राजकीय गणिते ठरविण्यात महत्त्वाचा बदल होणार आहे. पक्षीय स्तरावर उमेदवार ठरविताना या आरक्षणाचा विचार करावा लागणार आहे. महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांत नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे. अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांचा दबदबा जिल्ह्याच्या राजकारणात वाढताना दिसणार हे निश्चित आहे.








