अहिल्यानगर : येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून तीव्र भाष्य केले. आमदार संग्राम जगताप ही एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. याच विचाराने आज प्रत्येकजण हिंदुत्वासाठी काम करत आहे. जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावर राज्य करेल, अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. अशीच एकजूट कायम ठेवून हिंदूंची ताकद आमदार जगताप यांच्या मागे उभी करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
हिंदूसाठी काम करणाराच देशावर राज करेल
अहिल्यानगर येथील राजकीय वातावरण सध्या हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यांभोवती केंद्रित झाले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माळीवाडा बसस्थानक चौकातील सभेत आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे समर्थन करताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, काही लोक आमदार जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत आणि त्यांना शिवीगाळ करत आहेत, कारण त्यांच्या कार्यामुळे हिंदू समाज जागरूक होत आहे. विखे पाटील यांनी ‘व्होट जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘गोहत्या’ यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांना आव्हान दिले की, जोपर्यंत हे मुद्दे बंद होत नाहीत, तोपर्यंत धर्मनिरपेक्षतेची भाषा करणे योग्य नाही. त्यांनी पुढे सांगितले की, जगताप हे केवळ एक व्यक्ती नसून, एक विचार आहेत, आणि हिंदूंसाठी काम करणाऱ्यांनाच भविष्यात देशावर राज्य करण्याची संधी मिळेल.
देशात अबू आझमींना वारकऱ्यांबद्दल बोलण्याचा जसा अधिकार आहे, तसाच अधिकार आमदार जगताप यांना हिंदूंच्या रक्षणासाठी बोलण्याचा आहे. जगताप, भंडारे, बेग यांनी जी भूमिका घेतली आहे, तितके प्रखर मी बोलू शकत नाही. मला त्या रुळावर यायला वेळ लागेल. हळूहळू मीही त्या मार्गाकडे आलो आहे. पण संग्राम मला ओव्हरटेककडून पुढे गेल्याने मी त्यांना पाठीमागे त्यांना धक्का द्यायला उभा असल्याचे सुजय विखे म्हणाले.








