लोणी : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्तांसाठी ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला काही साखर कारखानदारांकडून विरोध झाला. या पाश्र्वभूमीवर लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नुतनीकरणाच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी फडणवीस स्पष्टपणे म्हणाले की, “सरकारने साखर उद्योगाच्या अडचणीच्या काळात नेहमी साथ दिली. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी आर्थिक मदत केली. पण जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, तेव्हा काहींना स्वतःच्या नफ्यातील फक्त ५ रुपये देणंही परवडलं नाही. हे अतिशय खेदजनक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “आपण केवळ ५ रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याची विनंती केली होती. फार तर २५ लाख रुपयांचा भार एका कारखान्यावर आला असता. पण त्यावरून काहींनी अनावश्यक गोंधळ घातला, जणू शेतकऱ्यांकडूनच पैसे काढले जात आहेत. काही कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनावेळी काटा मारला जातो, अशी माहिती मिळाली आहे. अशा कारखान्यांना मी स्वतः पाहतो आणि योग्य कारवाई करणार आहे.”








