आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया
संगमनेर / प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीचा भगवा फडकला असून हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि विकासाच्या राजकारणाचा कौल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, संपूर्ण राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या काळात राज्यात विकासाची घडी बसवली आहे. पायाभूत सुविधा, नागरिकाभिमुख योजना, शहरी विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळेच जनतेने महायुतीवर विश्वास टाकला आहे. हा विजय म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि जनतेच्या अपेक्षांना मिळालेली पावती आहे.
महानगरपालिकांमधून महायुतीला मिळालेला कौल हा केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. मात्र, दुर्दैवाने संगमनेरकरांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाला डावललं. परंतु आम्ही झालेल्या निकालाचा सन्मान करून संगमनेर शहराच्या विकासाला कटिबद्ध राहणार आहे. आगामी काळात शहरे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न करण्यासाठी महायुती कटिबद्ध राहील”, असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.








