संगमनेर : तालुक्यातील म्हसवंडी येथील ब्राह्मणदरा डोंगराला भीषण आग लागून एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल, बुधवारी (दि. १९) दुपारी घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
म्हसवंडी येथील सीताराम तुकाराम जाधव (वय ५३) हे मंगळवारी (दि. १८) जनावरे चारण्यासाठी परिसरातील ब्राह्मणदरा डोंगरावर गेले होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी जाधव हे घरी न आल्याने त्यांच्या भावासह कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पण डोंगराला भीषण आग लागली होती. त्यामुळे त्यांनी शोध मोहिम पुढे न नेता, बुधवारी सकाळी पुन्हा डोंगरावर जाऊन शोध घेतला. तेव्हा, जाधव यांच्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झालेला आढळून आला.
या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांसह घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजी दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने म्हसबंडी गावासह आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.








