संगमनेर : आश्वी बुद्रुक येथे केवळ दोनशे रुपयांच्या उसने व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत युवकाचे नाव मतीन मेहबूब शेख (वय २५) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मित्र आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्याच्या वडिलांकडे मागितल्याचा राग आल्याने त्याने पाठीत खिळा भोसकून मतीन शेख याला गंभीर जखमी केले. प्राथमिक उपचारानंतर मतीनला पुढील उपचारांसाठी पुणे येथे हलविण्यात आले; मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आश्वी पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे.
मयत मतीनची आई बिल्किस उर्फ शकीरा मेहमूद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. ८) रात्री सुमारे ८.४५ वाजता मुजफ्फर याला आरोपी आसीफ शेख याने फोन करून मतीनच्या पाठीत खिळा घुसविल्याची माहिती दिली आणि तात्काळ लोणी येथील प्रवरा रुग्णालयात येण्यास सांगितले. रुग्णालयात पोहोचल्यावर मतीनने आईला सांगितले की, प्रतापपूर शिवारातील शासकीय विश्रामगृहाशेजारी मंदिराजवळ तो बसला असताना आसीफ सलीम शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड व गौतम गायकवाड यांच्यासोबत त्याची जोरदार बाचाबाची झाली.
दरम्यान, थोड्याशा पैशावरून जवळच्या मित्रांमध्ये झालेला वाद खुनापर्यंत पोहोचल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैशासाठी मैत्री तुटल्याची ही घटना सर्वांना धक्का देणारी ठरली आहे.








