संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या जलपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. “पन्नास वर्ष सत्ता हातात असूनही जे काम जमलं नाही, ते पोरा-बाळांनी करून दाखवलं,” असा टोला त्यांनी लगावला.
डॉ. विखे म्हणाले, “निळवंडे डावा कालवा योजना तब्बल ३०-४० वर्षे कागदावरच होती. बैठका, आश्वासने दिली जात होती, पण पाण्याचा थेंबही गोरक्षवाडी, संगमनेर आणि परिसरातील गावांपर्यंत पोहोचला नव्हता. जनतेच्या अपेक्षा वाढवल्या, पण त्यांची पूर्तता झाली नाही. आज मात्र या प्रकल्पामुळे शेतीसह पिण्यासाठीही मुबलक पाणी मिळणार असून, हा टप्पा शेतकऱ्यांच्या जीवनमानात क्रांती घडवणारा आहे.”
विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी सांगितले, “२५-२५ वर्षे मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही, आणि मतदारसंघात २०० टँकर फिरत होते. अखेर संगमनेर मतदारसंघातील जनतेने बदल घडवला आणि आमदार अमोल खताळ यांना निवडून दिलं. घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम हवं आणि ते आता तालुक्यात सुरू झालं आहे.”
प्रकल्पातील यशस्वी टप्प्यांविषयी बोलताना डॉ. विखे म्हणाले, “भोजापुरचं पाणी नान्नज दुमाला, तीगाव, सोनोशीपर्यंत पोहोचवलं. गेल्या ३० वर्षांत कुणालाही जमलं नव्हतं, ते आज साध्य झालं. शिस्त, नियोजन आणि कटाक्ष ठेवला, तर कोणतीही योजना पूर्णत्वाला नेता येते. पाणी आणणं ही केवळ राजकारणाची गोष्ट नाही, तर ती जनतेच्या जगण्याशी निगडित जबाबदारी आहे.” असे मत डॉ. सुजय विखे यांनी मांडले.
दरम्यान, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना डॉ सुजय विखे पाटलांवर टीका केली होती. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरातांनी यांनी “मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो, आम्ही एका वयाचे आहोत. सुजय विखेंवर काय बोलायचं? आम्हाला पोरा-बाळांवर चर्चा करायला लावू नका.








