लोणी : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात मान्सून लांबल्याने लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्यात आले आहे. मान्सून लांबल्याने शेती तसेच गावागावातील पाणी योजनांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनंतर दि. १ जून २०२५ पासून तातडीने सुरु करण्यात आले असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून विभागाने तातडीने आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली आहे.
लाभक्षेत्रात मान्सुनचा पाऊस लांबल्याने शेती तसेच गावागावातील पाणी योजनांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या संदर्भात आ. विठ्ठलराव लंघे यांच्यासह श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेवून आवर्तन सोडण्याची मागणी केली.
मंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी, शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तनाचे एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने काल, मंगळवारी रात्री सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडले आहे.
या आवर्तनासाठी २४०० क्युसेकने भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. खरिपाच्या पिकांनाही आवर्तनामुळे दिलासा मिळेल. काही गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.








