मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रूपयांच्या आर्थिक मदतीची मोठी घोषणा केली आहे. या पॅकेजचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान भरून पुन्हा शेतीत उभे राहता यावे, असे सरकारने सांगितले. या वर्षी ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सरकारने २९ जिल्हे आणि २५३ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचे ठरवले आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान जास्त आहे, तिथे अटी शिथिल करून मदत दिली जाणार आहे. घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत.
दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.








