संगमनेरमध्ये जल जीवन मिशनचा बट्याबोळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
91

अधिवेशनात आमदार अमोल खताळांचा आरोप; मंत्री गुलाबराव पाटील यांनी समिती नेमावी

संगमनेर / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर जल’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन योजनेच्या कामांचा संगमनेर तालुक्यात अक्षरशः बट्याबोळ झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

आमदार खताळ यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविणे हा आहे. मात्र तालुक्यात या योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून अनेक ठिकाणी कामांची गुणवत्ता आणि अंमलबजावणी याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून तालुक्यात विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिली असून काही ठिकाणी दर्जाहीन कामे झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नावर यापूर्वीही देखील आपण अनेकदा आवाज उठविला आहे. मात्र अद्यापही या कामांबाबत ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.

त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उच्चस्तरीय समिती नेमून संगमनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.या कामांमधील त्रुटींमुळे केवळ प्रशासनच नव्हे तर लोकप्रतिनिधींनाही बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here