संगमनेर : संगमनेर खुर्द परिसरातील कचरा डेपोला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. वाढते वायु प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी नगरविकास खात्या मार्फत काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केली? असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केला आहे. तसेच या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे.
मुंबई येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी तारांकित प्रश्न मांडताना आ. खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील गोळा होणारा सर्वकचरा घंटा गाड्यांमधून संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया सुद्धा केली जात नाही. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मार्च महिन्यामध्ये या कचरा डेपोला भीषण आग लागून वायु प्रदूषणात वाढ झाली. या परिसरातील नागरिकांना श्वास घेणे त्रासदायक झाले असल्याचे निदर्शनास आले होते. या कचरा डेपोतून मिथेन गॅस पसरत असल्यामुळे परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचा व संसर्गजन्य रोग यासारखे आजार उद्भवत असल्याच्या असंख्य तक्रारी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडे केल्या होत्या.
नगरपालिका प्रशासनाने याबाबत काय उपाययोजना केली?, असा सवाल आमदार खताळ यांनी उपस्थित केला. त्यावर संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला आग लागली होती. या कचरा डेपोतील आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराने परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी नगरपरिषदेस प्राप्त झाल्या नाहीत, असे आ. खताळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.








