संगमनेर: एका तालुक्याच्या विकासाची खरी ओळख ही तिथल्या मूलभूत गरजांवरून होते. संगमनेर तालुक्याचा अर्धा भाग हा पठार भागात असून, उर्वरित भागातही पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे येथील नागरिकांना, विशेषतः शेतकरी वर्गाला, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
40 वर्षे सत्ता एका व्यक्तीच्या हातात असताना, आजही एक सामान्य शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत असेल, तर ही परिस्थिती दुर्दैवी आहे. एवढा दीर्घकाळ सत्तेत राहून आणि तब्बल 17 वर्षे मंत्रीपद भूषवूनही, पाण्यासारखा मूलभूत प्रश्न सोडवता न येणे हे त्या नेतृत्वाचं अपयशच म्हणावं लागेल. प्रत्येक उन्हाळ्यात 100 ते 200 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. ही स्थिती बदलावी म्हणून संगमनेरकरांनी तालुक्यात परिवर्तन घडवून आणलं.
आज संगमनेरमध्ये “टँकरमुक्त संगमनेर” अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होताना दिसत आहे. याचे संपूर्ण श्रेय आमदार अमोल खताळ पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना जाते.
काल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘आमदारकीचं कवच हरपल्याची’ खंत व्यक्त केली. मात्र, संगमनेरच्या जनतेला एकच प्रश्न आहे – 40 वर्षे सत्तेत असतानाही पाण्यापासून जनतेला वंचित का ठेवण्यात आलं?
आज थोरात साहेब पाण्याच्या प्रश्नावर बोलतात. मात्र, जे कालवे सध्या सुरू आहेत, ते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले असून, त्यांच्या प्लास्टरचं काम सुरू आहे – हे जनतेला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे अशावेळी बोलताना, गेल्या 40 वर्षांच्या अकार्यक्षम नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे.
आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण पाइपलाइन प्रकल्प, कालव्यांचे रोटेशन, विहिरींचे पुनर्भरण आणि पठार भागासाठी विशेष जलविकास योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. तालुक्याच्या अनेक भागांमध्ये आता नियमित पाणीपुरवठा होतो आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ लागले असून, सर्वसामान्य जनता आ. खताळ यांच्या कार्याने समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळतं.
काल माजी मंत्री थोरात म्हणाले की, “संघर्षाशिवाय पर्याय नाही.” पण जर 40 वर्षं आमदारकी भूषवलेल्या व्यक्तीला असं म्हणावं लागत असेल, तर तालुक्याची अधोगती किती गंभीर आहे, हे सामान्य जनतेला सहज लक्षात येतं.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतात. मात्र, या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट आहे – तालुक्याच्या भल्यासाठी शांतपणे, संकल्पपूर्वक आणि सातत्याने काम करणारा नेता हाच खरा नेता असतो. गेल्या 40 वर्षांत जरी केवळ 5 वर्षेही जनहितासाठी काम केलं असतं, तर आज संगमनेर तालुक्याची स्थिती वेगळी असती, हे माजी मंत्र्यांनी लक्षात घ्यावं, असं आमदार अमोल खताळ म्हणाले.








