आमदार अमोल खताळ यांचे पालिका प्रशासन आणि ठेकेदारांना निर्देश.
संगमनेर: संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित अपूर्ण कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरनगरपरिषद प्रशासनास व संबंधित ठेकेदारास दिले आहेत.
शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या पुलाच्या कामाची काल गुरुवारी सकाळी आ. खताळ यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे,शिरीष मुळे,कैलास लोणारी, अविनाश थोरात दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ देशमुख, वरद बागुल, आश्विन परदेशी, सनी धारणकर, कृष्णा हासे तसेच साईनगर, घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अमोल खताळ म्हणाले की, म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळल्यामुळे अनेक वर्षे या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या गंभीर समस्येची दखल घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून नगरपालिकेच्या माध्य मातून ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले आहे. थोडेफार काम अपूर्ण राहिले आहे आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्या हस्ते या नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. तसेच या कामासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि ठेकेदारांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

दिगंबर गणेश सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या पुलामुळे आता दिलासा मिळेल. मागील ३ ते ४ वर्षे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. १६ जूनपासून शाळा सुरू होत असून, नवीन पुलावरून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येईल,” असे उद्गार आमदार खताळ यांनी काढले.
साईनगर परिसराचा विकास करणार
याच दौऱ्यात साईनगर पंपिंग स्टेशन व घोडेकर मळा भागातील महिला आणि नागरिकांनी त्यांच्या अनेक समस्यांचा पाढा आमदार अमोल खताळ यांच्या समोर मांडला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की “मागील लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केले. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून आता या परिसराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाईल.
आमदार अमोल खताळ
सदस्य, महाराष्ट्र विधानसभा , संगमनेर








