संगमनेर : काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच हे टक्केवारीच्या नादामध्ये असल्याने, शासनाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असतानाच आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेत घुलेवाडी गावातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी तो निधी वेळेत खर्च केला. मात्र, हा विकास आणि निधीचा योग्य वापर काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या समर्थकांना दिसत नाही, अशी टीका घुलेवाडी शिवसेना शाखेचे प्रमुख शरद पानसरे यांनी केली आहे.
शरद पानसरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने पंचायत समितीचे पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गावातील विकासकामांना गती देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे काही माजी लोकप्रतिनिधी गावात भ्रष्टाचार माजवून मनमानी कारभार करत आहेत. “साम, दाम, दंड, भेद” या सर्व गोष्टींचा वापर करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.
हे नेते प्रत्येक कामाचे श्रेय स्वतःकडे घेतात. घुलेवाडी गावात आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे सुरू असलेला विकास त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. जनतेने त्यांना घरी बसवले तरीही त्यांच्यात सुधारणा होत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी वेळोवेळी गावाला वेठीस धरले गेले आहे. काही व्यक्ती तर असे आहेत की, “शिवाय काही काम होणारच नाही” असे त्यांच्या कपाळावर जन्मताच लिहून आलेले आहे. मागील ४० वर्षांपासून लाभार्थी यादीत यांचेच नाव कायम दिसते.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केला तर त्यांना दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार या काँग्रेस नेत्यांकडून होत आहेत. गावातील गरीब जनतेला सतत दहशतीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. “आपण सांगू तीच पूर्व दिशा” या वृत्तीने हे लोक मनमानी कारभार करून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत.
माजी लोकप्रतिनिधींचे लक्ष गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अजिबात नाही. “आम्ही माजी मंत्र्यांचे माणसं आहोत” या नावावर पावत्या फाडून हे लोक फक्त स्वतःचा स्वार्थ साधत आले आहेत. पण यापुढे हे चालणार नाही. बगलबच्च्यांनी लक्षात ठेवावे की, हे सरकार महायुतीचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे. येथे चुकीची कामे सहन केली जाणार नाहीत. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
या प्रसंगी शिवसेना शाखा अध्यक्ष श्री. शरद पानसरे, मार्गदर्शक श्री. सोपानराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष श्री. भिकाजी राऊत, श्री. विलास राऊत, श्री. सिताराम पानसरे सर, श्री. स्वरूप राऊत, स्वप्निल राऊत, संजय पानसरे, कैलास काशीद, सारंगधर पानसरे, रोशन कोथमीरे, प्रशांत राऊत, सचिन पानसरे, प्रज्ञा शिंदे, सुरज राऊत, वैभव राऊत, नितीन राऊत, ओंकार काळे, प्रकाश पवार, सागर पवार व गावातील सर्व अनुसूचित समाजातील बांधव-भगिनी उपस्थित होते.








