लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेरचा विकास – सुरज चव्हाण

0
81

संगमनेर : रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला. आपल्यामध्ये काही लोक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना थारा देऊ नका. संगमनेर चे नाव हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी देशात पोहोचवले असून त्यांच्यामुळे संगमनेरचा विकास झाला असल्याचे बिग बॉस फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅली मध्ये ते बोलत होते. यावेळी मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, महेश गोपने,मनोज चव्हाण, रोशन चव्हाण, देवराम गुळवे आदींसह सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुरज चव्हाण म्हणाले की, माझ्यासारख्या गरीब मुलाला बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली. सुंदर का नसेल परंतु कलेच्या जीवावर आज राज्यांमध्ये मला मोठा मान सन्मान आहे. लातूर आणि संगमनेरचे प्रेम मोठे आहे. रितेश देशमुख यांनी मला संधी दिली आणि त्यामुळे माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे मला कळाले.

संगमनेर तालुका हा बारामती सारखा विकसित आहे हे ऐकून होतं मात्र संगमनेर मध्ये आल्यानंतर येथील विकास हा नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. सहकाराबरोबर येथे झालेले बसस्थानक ही विमानतळासारखे आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल संपूर्ण युवकांना मोठे आकर्षण आहे. मात्र काही युवक भरकटले असून यापुढे जातिभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका. रामोशी समाज हा प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे. उमाजी नाईकांचा वारसा आपल्या सर्वांना आहे. संघर्ष आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्र धर्म आणि गोरगरिबांचे स्वातंत्र्य वाढवायचे आहे. त्यामुळे एकजुटीने काम करा संगमनेरचे नावलौकिक वाढवा असे ते म्हणाले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, साध्या कुटुंबातून पुढे येऊन सुरज चव्हाण यांनी राज्यात आपला लौकिक वाढवला आहे. संगमनेर तालुक्यातील गोरगरिबांना कायम संधी देण्याचे काम लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी केले असून तालुक्यात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम आता युवकांना करायचे आहे असे त्या म्हणाल्या.

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने संगमनेर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते यशोधन कार्यालय अशी भव्य रॅली संपन्न झाली. यावेळी सिनेअभिनेता सुरज चव्हाण, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात या रॅलीमध्ये सहभागी झाल्या.याप्रसंगी सटाणा येथील स्वरसम्राट बँड च्या निनादाने संगमनेर दुमदुमले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here