संगमनेर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीला राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन मनापासून स्वागत केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीसह विद्यार्थ्यांचे आगमन झाले. यानंतर आमदार खताळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी आत्मनिर्भर, जबाबदार नागरिक आणि भावी राष्ट्रनिर्माते बनावेत, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करून शिक्षणाची गोडी वाढविणे, हा उद्देश यामागे असून, अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या स्वागत समारंभास गावातील सर्व शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरात अशाचप्रकारे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पालक एकत्र येत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य करत आहेत.








