संगमनेरमधील प्रलंबित कामांना मिळणार गती
आ.अमोल खताळ यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेंना दिले निवेदन.
मुंबई – संगमनेर मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा.ना. श्री. जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज, आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायतींच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. मतदारसंघातील गावांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित योजना मंजूर करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आमदार अमोल खताळ यांनी मंत्री महोदयांकडे केली.
ग्रामस्थांच्या गरजा आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जातील, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
“संगमनेरच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि करत राहील. शासनदरबारी मतदारसंघाच्या हितासाठी अधिकाधिक योजना मंजूर करून घेत ग्रामविकासाला दिशा देणे, हा माझा मुख्य उद्देश आहे.” भविष्यातही ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सहकार्याने संगमनेरच्या गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे प्रयत्न अविरत सुरू राहतील.असे प्रतिपादन यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले.








