संगमनेर : शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचे वास्तव्य राहिलेल्या तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडावर शहाजीराजे यांचे स्मारक व्हावे अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.
शहाजीराजे यांनी शहागडावरून स्वराज्याची संकल्पना मांडली होती. या पार्श्वभूमीवर शहागडावर संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी चाकण येथील डॉ. संदीप मेहिंद, ॲड. झिंजुरके, राजू दिक्षित, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, उपतालुकाप्रमुख बादशहा गुंजाळ, सावरचोळच्या सरपंच अनिता कानवडे, मिलिंद टपाल, शशिकांत मतकर, ॲड. मिनानाथ शेळके, बजरंग दलाचे तालुका संयोजक कुलदीप ठाकूर, भाजपचे उपाध्यक्ष दिलीप कोल्हे, शशिकांत मतकर, अक्षय थोरात, आशिष कानवडे, योगेश शेटे, दिलीप कोल्हे उपस्थित होते.
आ. अमोल खताळ म्हणाले की, शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे या शहागडावर वास्तव्य झाले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा शहागड काहींच्या अनास्थेमुळे अविकसित राहिला. मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात शहागड आणि महाकाय वडाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करून राज्यसरकारचे याकडे लक्ष वेधले. हा परिसर पर्यटन विकास विभागात घेऊन यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आपण पर्यटन विकासमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे. पुढील वर्षी हा संकल्प दिन अधिक जोमाने साजरा केला जाईल. त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी स्वतः करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सुद्धा शिवसंकल्प दिन म्हणून साजरा व्हावा
ज्याप्रमाणे शहाजीराजे यांचा संकल्प दिन साजरा होतो तसाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सुद्धा शिवसंकल्प दिन म्हणून साजरा व्हावा. यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी चाकण येथील शिवचरित्राचे अभ्यासक संदीप मेंद्रे यांनी केली. त्यांच्या मागणीचा विचार करून डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नक्कीच हा विषय उपस्थित करू. असा विश्वास आमदार खताळ यांनी मेंद्रे यांना दिला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शहागडावर घेऊन येईल – आ. खताळ
या संकल्पदिनाला सन २०३३ मध्ये चारशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा आपणच राहू देशाचे पंतप्रधान येईल की नाही ते सांगू शकत नाही परंतु त्यावेळी जे कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल त्यांना मी या शाहागडावर नक्कीच घेऊन येईल. असा शब्द यावेळी आमदार अमोल खताळ यांनी पेमगिरीकरांना दिला.








