संगमनेर : गुरुपौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त संगमनेर शहरात धार्मिक परंपरा जपत, शिर्डीच्या दिशेने पायी वारी करणाऱ्या साईभक्तांसाठी महाप्रसाद वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. श्री अश्वेश्वर महादेव हिंदू मंडळ आणि आमदार अमोलभाऊ खताळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती परिसरात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. निलम खताळ यांनी सहभागी घेत भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो साईभक्त शिर्डीकडे पायी वारीसाठी निघाले आहेत. संगमनेर शहरातील दिल्ली नाका, पंचायत समिती परिसरातून हजारो साईभक्त शिर्डीकडे रवाना झाले. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी महाप्रसाद वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या वारीचा प्रारंभ मंगलमय करण्यात आला.
सौ. निलम खताळ यांनी महाप्रसाद वाटप कार्यक्रमात भाविकांना साईदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत भाजपा शहराध्यक्षा सौ. पायल ताजणे, शिवम गुंजाळ, विलास घुगे, लालू गुंजाळ, निलेश गाडेकर, दीपक वाघमारे, प्रदीप गुंजाळ, सौरभ गुंजाळ, आदित्य नवले, सागर घुगे, प्रदीप राजपूत, हेमंत गाडेकर, निखिल धुमसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी भाविकांच्या सेवेसाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजकांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. साईभक्तांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. शिर्डीच्या दिशेने निघताना भाविकांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेला महाप्रसाद वाटपाचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.








