संगमनेरमधील गोवंश हत्या आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा विधानसभेत गाजला
मुंबई : संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील हिंदूंच्या जमिनी बेकायदेशीरपणे वक्फ मंडळाच्या नावे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उघड केला. हिंदूंच्या घरांवर आणि देवस्थानांच्या जमिनींवर अन्यायकारक दावा करून शेकडो कुटुंबांना बेघर करण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
संगमनेरमधील १७७ हिंदू कुटुंबांवर अन्याय!
संगमनेर शहरातील सर्वे नंबर १४९ (जुना सर्वे नंबर ८०३) मधील ४ एकर १७ गुंठे जमीन वक्फ मंडळाने बेकायदेशीररित्या वक्फ संपत्ती म्हणून घोषित केली आहे. हे अन्यायकारक निर्णय हिंदू कुटुंबांवर लादले गेले आहेत. सुरुवातीला केवळ २२५ चौ. फूट जागेवर दावा होता, मात्र २०१९ मध्ये पूर्ण जमिनीचा वक्फ बोर्डाने बेकायदेशीर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला.
ही जमीन मूळतः हिंदूंच्या इनाम स्वरूपात होती आणि तिचा कोणताही संबंध वक्फ संपत्तीशी नव्हता. शंकर गजाबा ताजणे यांनी कूळ कायद्यांतर्गत ही जमीन खरेदी केली होती. त्यानंतर अनेक हिंदू कुटुंबांनी ती कायदेशीररित्या विकत घेतली आणि घरे, दुकाने, शाळा उभारल्या. मात्र, कोणताही वैध पुरावा नसताना वक्फ बोर्डाने ही जमीन आपल्या नावावर करून घेतली.
देवस्थानांच्या जमिनीही वक्फ मंडळाच्या ताब्यात?
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, सुकेवाडी आणि पारेगाव येथील देवस्थानांच्या जमिनीही वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामध्ये
घुलेवाडी – श्री कानिफनाथ देवस्थानच्या इनाम जमिनी
सुकेवाडी – श्री कान्होबा देवस्थानची जमीन
पारेगाव – श्री अश्विनाथ महाराज मंदिराची जमीन
या सर्व जमिनी हिंदूंच्या पूजा-अर्चा आणि देवस्थानाच्या कार्यासाठी राखीव होत्या, मात्र मुस्लिम फकीरांनी त्यावर बेकायदेशीर ताबा मिळवून त्या वक्फ संपत्ती घोषित केल्या. पारेगाव येथील शिवलिंग जमिनीत पुरण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवत सरकारला यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. वक्फ मंडळाच्या बेकायदेशीर दाव्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कायदा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार अमोल खताळ यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्या केल्या –
१) वक्फ मंडळाचा अवैध दावा त्वरित रद्द करावा
२) संगमनेर आणि तालुक्यातील हिंदूंच्या जमिनी त्यांना परत द्याव्यात
३) देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण होऊ नये यासाठी कठोर कायदा करावा
गोवंश हत्या आणि बांगलादेशी घुसखोरीवरही कठोर कारवाईची मागणी
आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश हत्येचा मुद्दाही विधानसभेत मांडला. पोलिस आणि प्रशासन वारंवार कारवाई करूनही हे कत्तलखाने सुरूच आहेत असे देखील त्यांनी यावेळी निदर्शनास आणले.
तसेच, पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद बांधकामामुळे नागरी असुविधा निर्माण होत आहे. येथे बांगलादेशी घुसखोरांनी अतिक्रमण केले असून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे हे मदरसे त्वरित जमीनदोस्त करावेत, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतली दखल
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, राज्य शासनाने या मुद्द्यांची गंभीर दखल घेतली आहे आणि वक्फ मंडळाच्या बेकायदेशीर नोंदींबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच, बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.








