संगमनेर आणि परिसरात प्रसिद्ध असलेल्या राजहंस सहकारी संस्थेच्या मिठाईत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांनी घेतलेल्या पेढ्यांमध्ये बुरशी आढळल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही संस्था माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित असून, त्यांच्या छत्रछायेखाली जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक ग्राहकांनी राजहंसच्या मिठाईबाबत तक्रारी केल्या आहेत. खराब झालेल्या पेढ्यांमुळे काही जणांना विषबाधा होण्याचीही भीती आहे. असे असताना, संस्थेच्या व्यवस्थापनाने कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई करून उत्पादन केंद्राची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यापूर्वीही राजहंसच्या उत्पादनांबद्दल तक्रारी झाल्या होत्या, मात्र राजकीय दबावामुळे योग्य कारवाई झालेली नाही. राजकीय वरदहस्त असलेल्या या सहकारी संस्थेत ग्राहकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही. बाळासाहेब थोरात यांच्या प्रभावामुळे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
संगमनेरकरांनी राजहंसच्या उत्पादनांपासून सावध राहावे आणि खराब पदार्थांची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी. सहकारी संस्थांचा उद्देश लोकहित असायला हवा, मात्र इथे जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला.








