संगमनेर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत तालुक्यातील १५ किलोमीटरच्या एकूण आठ रस्त्यांच्या कामांना सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी चार रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता आणण्याचे श्रेय फक्त पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने आणि आ. अमोल खताळ यांचेच असून उर्वरीत चार रस्त्यांच्या कामांना लवकरच मंजूरी मिळेल. इतरांनी खोटा डंका वाजवून पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. महायुती सरकारमुळेच तालुक्यात विकासाची पायाभरणी होत असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी सांगितले.
यापुर्वी साकूर पठार भागाच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष करणारे मामा-भाचे यांना अचानक आता साकूर पठार भागाच्या विकासाची आठवण झाली आहे. जनतेने पराभूत केल्यानंतर आता फक्त आ. अमोल खताळ यांच्या कामांचे श्रेय घेण्यात धन्यता मानण्याची वेळ थोरात-तांबे यांच्यावर आली असल्याचा टोला भोसले यांनी लगावला.

वास्तविक साकूर पठार भागातील डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली ते जवळेकडलग रस्ता खर्शिंदे ते खांबे मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द साकूर ते बिरेवाडी आणि तारकसवाडी ते खंडेरायवाडी पारेगाव ते तिगाव वडझरी शिंदोडी ते ठाकरवाडी साकूर ते बिरेवाडी या रस्त्यांच्या कामाना निधी मिळावा म्हणून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आ.अमोल खताळ यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांना ऑगस्ट २०२५ मध्ये पत्र देवून निधी देण्याची विनंती केली होती. या महत्वपूर्ण रस्त्यांच्या विकास कामांना आ. खताळ यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने रस्ते विकासास मोठी गती मिळाली असल्याचे भोसले म्हणाले.

सध्या तालुक्याच्या विकास प्रक्रियेला महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे पाठबळ मिळत आहे. आ.खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून यापुर्वी कधीही न झालेल्या रस्त्यांच्या कामांना निधी मिळू लागला आहे. मात्र निधी आणण्यात कोणतेही योगदान नाही असे तांबे-थोरात खोटे श्रेय घेवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून भोसले म्हणाले की, मागील पंचेचाळीस वर्ष ज्यांना साकूर पठार भागाच्या विकासाला काही करता आले नाही ते आज आ. अमोल खताळ यांच्या कामाचे श्रेय घेवून स्वताची पाठ थोपटून घेत आहे.मात्र तालुक्यातील जनता एवढी दूधखुळी नाही.काम कोण करतय हे जनतेला माहीत आहे.बाकीच्यांनी फक्त चाळीस वर्षे सतेच्या नावाखाली धमाल करून जनतेची फसवणूक केली.सत्ता गेल्यानंतर सुध्दा आता तेच करीत असल्याची टिका भोसले यांनी आ.सत्यजीत तांबे यांच्यावर केली आहे.

साकूर येथे १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ.खताळ यांनी सर्व रसत्यांच्या कामाना निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. मात्र काहीजण यामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच साकुर पठार भागातील जनतेची आठवण होवू लागली आहे.








