संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपुर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसल्याच्या तक्रारी मोठ्या स्वरुपात प्राप्त झाल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेवून यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहिती आ. अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे आणि वसंतराव गुंजाळ, संतोष रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे की संगमनेर कारखान्याची निवडणुक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यासाठी गटांमध्ये बैठका होवून प्राथमिक तयारीही सुरु केली होती. तथापि मतदार यादीमध्ये असलेल्या त्रूटी अतिशय गंभीर आणि सहकारी संस्थाच्या कार्यप्रणालीला हरताळ फासण्यासारख्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
कारखान्याचे दोन हजार सभासद मयत आहेत. या मयत सभासदांच्या वारशांची कोणतीही नोंद कराखान्याने केलेली नाही. विशेष म्हणजे मयत सभासदांपैकी तीस टक्के सभासद हे आम्हाला मानणारे होते. “सहकारी चळवळीत राजकारण नको” ही आमची भूमिका आहे. मात्र कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा कुठेही विचार केला नाही हे सहकार चळवळीमध्ये अभिप्रेत नसल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम चे काम सुरूच राहाणार असून सभासद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही व्यक्तिगत त्रास आणि त्यांचे अर्थिक नूकसान होवू नये हीच आमची भूमिका असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले.








