संगमनेर : शहर आणि परिसरात वाढत्या बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीमुळे स्थानिक अधिकृत रिक्षा चालक-मालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा अनधिकृत रिक्षांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवछत्रपती रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले. संघटनेचे म्हणणे आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रिक्षा थांबतात आणि प्रवासी वाहतूक करतात. या चालकांकडे कुठलाही परवाना नाही. हे अनधिकृत रिक्षाचालक शहरात कुठेही थांबतात, वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत आणि स्थानिक प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण करतात.
तसेच, अनाधिकृत रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि जास्त भाडेही आकारले जात आहे. त्याचबरोबर अधिकृत रिक्षाचालकांना दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की सारखे प्रकार घडताना दिसतात. परिणामी, परवानाधारक रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अधिकृत चालकांवर अन्याय होत आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करता, शिवछत्रपती रिक्षा संघटनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.








