संगमनेर : साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज (रविवार) संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
म्हाळुंगी नदीवर नवीन पूल उभारण्यात आल्यामुळे या भागातील रहिवासी, भाविक तसेच विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला आहे. पूर्वी या ठिकाणी असलेला पूल अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.
यामुळे नदी पार करण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता, मात्र अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हा नवीन पूल आता उभा राहिला आहे.
प्रसंगी उपस्थित आमदार अमोल खताळ यांनी या नवीन पुलामुळे स्थानिक नागरिकांचे दळणवळण अधिक सोयीचे व सुरक्षित होणार असून, हा पूल परिसराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








