संगमनेर : कीर्तनकर संग्राम भंडारे यांच्या घुलेवाडी येथील कीर्तनानंतर मोठा राजकीय संघर्ष उफाळला आहे. ही लढाई आता धर्मावर आधारित आरोप-प्रत्यारोपांनी रंगली आहे. आज (गुरुवारी) संगमनेरमध्ये थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. संग्राम भंडारे यांचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार टीका केली. नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच थोरात बोलताना पुढे म्हणाले, चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.
नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. असा आरोप थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर केला.
कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले, तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून, गावोगावी गुंड दहशत माजवत आहेत. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून, तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा, असे आवाहन थोरात यांनी केले.








