संगमनेर: शेतकर्यांच्या नावे ट्रॅक्टर घेवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅक्टर पळवणार्या टोळीतील दोन आरोपींना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अटक करत 9 ट्रॅक्टरसह 2 मोटारसायकल असा एकूण 71 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी भालचंद्र अशोक साळवी (रा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना तुम्हांला ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो असे सांगून नवीन ट्रॅक्टरचे डाऊन पेमेंट एक लाख रुपये रुपये मी भरुन ट्रॅक्टर तुमच्या नावावर घेवून देतो, ट्रॅक्टर आल्यनंतर तुम्हांला वाटल्यास ट्रॅक्टर माझ्याकडे कामाला लावा, त्या मोबदल्यात 80 हजार रुपये देतो. तसेच पुढचा सहा महिन्यांचा हप्ता देखील भरतो आणि सहा महिन्यासाठी ट्रॅक्टर वापरण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपये महिना देतो असे आमिष दाखवले.
यावरुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेवून त्यांना एल अँड टी कंपनीचे फायनान्स कंपनीचे कर्ज करुन 4 जून, 2025 रोजी ट्रॅक्टर श्री. महाकाली शोरुम श्रीरामपूर येथून घेवून दिले होते. सदरचे ट्रॅक्टर 6 जून, 2025 रोजी आरोपी यांनी फिर्यादीची फसवणूक करुन स्वतःकडे घेवून गेले व ठरल्याप्रमाणे 80 हजार रुपये फिर्यादीस दिले नाहीत. त्यानंतर फिर्यादीचे फोन उचलणे बंद केले. त्यावेळी फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी राजूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला.








