लोहारे कासारे पाझर तलावातून आ. खताळ यांच्या हस्ते सोडले शेतीसाठी पाणी
संगमनेर / प्रतिनिधी
निळवंडे डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने लोहारे, कासारे आणि मेंढवन परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या भागात अखेर पाण्याचा प्रवाह पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी ‘संजीवनी’ ठरणार असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे.

संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे येथील पाझर तलावातून रविवारी आ. अमोल खताळ यांच्या हस्ते पाण्याचे विधिवत पूजन करून पाझर तलावातून शेतीच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रीतम शेवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, विजय पोकळे, दिलीप पोकळे, वाल्मीक पोकळे, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, गोरख पोकळे, शुभम पोकळे, सुधीर पोकळे, विजय दिघे, मोहन पोकळे, चंदू कारले, सागर कारले, दिलीप गायकवाड, नाना कारले, बाळासाहेब कारले, यमनाथ कारले, रघु कारले, रामनाथ बो-हाडे, मेंढवण येथील शरद यलमामे आणि बाळासाहेब बढे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, लोहारे कसारे मेंढवन हाफ परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता .अनेक पिढ्यांनी पाणी टंचाईचा सामना केला. शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीवर अवलंबून राहावे लागायचे. अनेकदा तलाव कोरडेच राहायचे, त्यामुळे पिकांचे नुकसान व्हायचे. मात्र राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा ऐतिहासिक क्षण साध्य झाला आहे. लोहारे-कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत सन १९६६ मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावाची साठवण क्षमता ४३.२८ दशलक्ष घनफूट इतकी आहे. अनेक वर्षे पाण्याअभावी ही क्षमता कधीच पूर्णपणे वापरात आली नव्हती. परंतु यंदा तलावात २९.०३० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवन या गावांतील सुमारे १७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे म्हणाले, “पाझर तलावाची उभारणी होऊन अनेक वर्षे लोटली; मात्र या प्रकल्पात नियमित पाणी येत नव्हते. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तलावात पाणी उपलब्ध झाले आहे. पुढेही हा प्रकल्प सातत्याने कार्यरत राहून परिसरासाठी ‘संजीवनी’ ठरेल.”
“लोहारे, कासारे आणि मेंढवन परिसराने अनेक वर्षे अवर्षणाच्या झळा सहन केल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना ज्वारी-बाजरीसारख्या मर्यादित पिकांवर समाधान मानावे लागायचे. मात्र आता निळवंडेच्या पाण्यामुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल होणार आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, भाजीपाला यांसारखी पिके घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. चाऱ्यांद्वारे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचावे, यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा तातडीने करण्यात येतील. संबंधित प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले असून, याभागाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.”
– आमदार अमोल खताळ








