शेतकऱ्यांची अडचण होवू देवू नका, अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर : तालुक्यात सध्या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या युरिया खताचा तालुक्यातील ४३९ कृषीसेवा केंद्रांत १५२९ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. अधिकचा साठा लवकरच उपलब्ध होईल आशी माहीती आ. अमोल खताळ यांनी दिली.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आ. अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संपर्क साधून युरीया उपलब्धतेचा आढावा जाणून घेतला. तालुक्यात काही भागांत युरियाच्या तुटवड्या बाबत विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने आ. अमोल खताळ यांनी गांभिर्याने याची दखल घेवून कृषी अधिकाऱ्यांना युरीयाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कृषी विभागाच्या समन्वयातून खत वितरण सुरळीत सुरू असून युरियाचा कुठलाही तुटवडा तालुक्यात नाही. सर्व कृषी सेवा केंद्रांच्या मार्फत टप्प्याटप्प्याने युरियाचे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच युरियाची रॅक येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला खत उपलब्ध करून दिले जाईल. ”दरम्यान, कृषी विभागानेही शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा/खत पासबुक आदी कागदपत्रांसह अधिकृत केंद्रांवरूनच खत खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. युरिया उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी माझ्या संपर्क कार्यालयात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. अमोल खताळ यांनी केले आहे.








