नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रश्नावर अधिवेशनात ठाम आवाज उठवणार : आमदार खताळ

0
47

संगमनेर : नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका असून यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे मांडणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. काही जण या मुद्द्यावर राजकारण करून ‘आपली पोळी भाजून घेण्याचा’ प्रयत्न करीत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

आमदार खताळ म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरवरूनच व्हावा, अशी आमची प्रारंभिक मागणी आहे. पावसाळी अधिवेशनातही आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांनी जीएमआरडीचा तांत्रिक अहवाल सादर करत मार्ग बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की पर्यायी ट्रॅक तयार करून मार्ग बदलणे पूर्णतः शक्य आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हायला हवा, याबाबत आमची भूमिका आजही ठाम आहे.

राज्य सरकारचा या प्रकल्पात ५० टक्के वाटा असल्याने संगमनेरवर अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ आली तर महायुतीतर्फे जनतेच्या हितासाठी राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीएमआरडीचे कारण देत हा रेल्वेमार्ग बदलणार असल्याची संपूर्ण माहिती पदवीधर आमदारांना आधीपासून होती. तरीही त्यांनी ही माहिती जनतेपासून लपवून का ठेवली? केवळ राजकारणासाठी विकासाचा बळी दिला गेला काय?

– अमोल खताळ ( आमदार संगमनेर विधानसभा)

खासदार वाकचौरे यांची भूमिका संशयास्पद – खताळ

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी लोकसभेत या विषयावर भूमिका मांडली नाही, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here