संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद प्रसंगी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार अमोल खताळ म्हणाले, ज्येष्ठ नेते अहिल्यानगर जिल्हा बँक अध्यक्ष, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची अत्यंत दुःखद वार्ता समजली. एक प्रगल्भ लोकनेते, कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीर उभे राहणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. हे मनाला अतिशय वेदनादायी आहे.
कालच लोणी येथे विविध विषयांवर आमदार कर्डीले यांच्याशी संवाद साधला. नेहमी विविध विषयावर त्यांचे मार्गदर्शन मिळत होते. कार्यकर्ता ते मंत्रिपद असा थक्क करणारा राजकीय प्रवास महाराष्ट्राने त्यांचा पाहिला आहे. त्यांचे समाजकारण, जनसेवा आणि संघटन कौशल्य नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो आणि दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना व समर्थकांना शक्ती लाभो, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे.








