संगमनेर : गोरक्षा दल संघटना संगमनेरमधील गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवेचे निस्वार्थ कार्य करत आहे. कसायांच्या तावडीतून अनेक जनावरे आणि वासरे वाचवत त्यांना नवीन जीवनदान देण्याचे पुण्यकार्य ही संघटना सातत्याने करत आहे. यासोबतच धर्मांतरण, लव्ह जिहाद, विद्यार्थ्यांचे प्रश्न, गरीबांवरील अन्याय, महापुरुष जयंती उत्सव, रक्तदान शिबिरे, जखमी जनावरांचे मोफत उपचार तसेच गरजूंना मदतीचा हात देणारे ‘गरजवंतांची दिवाळी’ असे अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम हे संघटना नियमितपणे राबवत आहे.
या निस्वार्थ सेवेची दखल घेण्यात आली. जीवदया गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेश दोशी यांच्या पाठपुराव्यामुळे, २ ऑगस्ट रोजी ठाणे येथील थ्री स्टार हॉटेल टिपटॉप येथे आदी घंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गोरक्षा दल संघटनेला त्यांच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धर्मकार्यासाठी संस्थेला भरघोस आर्थिक मदत देखील देण्यात आली.
दरम्यान केवळ दोन-चार जणांपासून सुरू झालेल्या या प्रवासाला आज संघटनेचे रूप प्राप्त झाले असून, प्रत्येक गोरक्षक आपल्या परीने निस्वार्थ गोसेवेत सहभागी होत आहे. त्यामुळे हा पुरस्कार संपूर्ण संघटनेच्या गोरक्षक बांधवांचा आहे. मिळालेला निधी यंदाही ‘गरजवंतांची दिवाळी’ उपक्रमासाठी वापरला जाईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकृत करताना अविनाश शहा, शिवम गुंजाळ, ज्ञानेश्वर खैरनार, रितेश सांगळे यांसारखे पदाधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारासाठी संघटनेचे मनोजभाई शहा, राजेशजी दोशी आणि ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले असून, या सन्मानामुळे गोसेवा कार्यास नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.








